[१७ जून ]
महाराष्ट्राच्या मातीत आणि या मातीतल्या माणसांच्या मनात आणि आचरणात ज्यानं स्वाभिमान आणि स्वातंत्र्य पेरलं, अशा छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनात ते स्वाभिमान आणि स्वातंत्र्याच बीज ज्या आईने पेरलं, ती आई म्हणजे जिजाऊसाहेब. त्यांना फक्त शिवबांच्याच नव्हे तर अवघ्या महाराष्ट्राच्या आई म्हणाव लागेल, म्हणूनच राष्ट्रमाता आणि राजमाता हे नाव जिजाऊ साहेबांना अगदी शोभते. काही शतकांनंतर सुद्धा छत्रपतींचे विचार किती सद्य परिस्थितीला साजेशे वाटतात. सामाजिक समता, मानवी हक्क, स्त्रियांचा हक्क, सर्वांसाठी समान न्याय आणि अनेक मानवी मुल्यांचा आदर करणारे विचार, जे छत्रपतींच्या आचरणात होते, आपण म्हणू शकतो या आईनेच त्यांना दिले; त्यासाठीचे वातावरण आणि संस्कार जिजाऊ साहेबांनी शिवरायांना दिले. हा सह्याद्रीचा राजा, सहयाद्री सारखाच कणखर आणि अंगाई सारखा दयाळू व मायाळू या आईच्या पदराखालीच झाला. पुढे छत्रपतींच बाळ,बाळराजे, धर्मवीर संभाजी महाराज ही याच कुशीत आणि संस्कारात वाढले.
याच आऊसाहेबांची साथ शहाजी राजांना होती, ज्यांनी स्वराज्याच स्वप्न जिजाऊ साहेबांसोबत पाहिलं; जिजाऊनी ते छत्रपतींकडून साकार करून घेतलं.[या वाक्यानं छत्रपती परप्रकाशित होत नाहीत; आणि तो उदेष्य ही नाही.कोणत्याही बाळाच्या यशात त्याच्या आईच्या संस्काराचा सिंहाचा वाटा असतो आणि राजे स्वयंप्रकाशित सूर्य होते,ज्याला सदैव तितक्याच तेजाच्या आईचे मार्गदर्शन लाभले]
महाराजांचा राज्याभिषेक झाला (६ जून) आणि त्यानंतर काही दिवसातच आऊसाहेबांचे पाचाड येथे निधन झाले .एक स्वाभिमानाची जननी काळाआड गेली, पण स्वाभिमानाच साम्राज्य बघूनच! राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ साहेब यांची आज (१७ जून) पुण्यतिथी आणि या निमित्य पुन्हा स्वतःला आठवण करून देऊयात की त्याच जिजाऊच्या विचारांचा अंश आमच्यात आहे आणि आम्ही आयुष्यभर स्वाभिमानी आणि स्वातंत्र्याच्या विचारांचे पाईक राहू.
स्वाभिमान आणि स्वातंत्र्याची साक्षात भवानी, एका सुर्याइतक्या तेजस्वी आणि सहयाद्री सारख्या कणखर आणि खंबीर असलेल्या युगपुरुषाची माता, धर्मवीर आणि ज्ञानवीर छत्रपती संभाजी राजांची आजी आणि आऊ असलेल्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ साहेबांना जिजाऊ.कॉम चा मनाचा मुजरा आणि कोटी कोटी प्रणाम.
जय जिजाऊ! जय शिवराय! जय महाराष्ट्र!